Sunday, December 20, 2020

अभ्यास करणे

वाद... प्रतिवाद.. संवाद.

विचारे आकळे विचार
आचारें बिंबतो विचार
संवादे सुधारे विचार

विचारी आदळे विचार
नाद करित घडे वाद
संघर्ष पेरितो वाद

विचारा झोंबतो विचार
सुस्पष्ट बनतो विचार
विचारा आदरी विचार

विचार विचारा आव्हान
सुविहीत सृजनशील साकार
प्रतिवादे सुधारे वाद

सुजनीं खेळता विचार
प्रतिवाद खंडितो विचार
झुळझुळता झरा संवाद

सदानंद.

वाद.. प्रतिवाद .. संवाद

वाद... प्रतिवाद.. संवाद.

विचारे आकळे विचार
आचारें बिंबतो विचार
संवादे सुधारे विचार

विचारी आदळे विचार
नाद करित घडे वाद
संघर्ष पेरितो वाद

विचारा झोंबतो विचार
सुस्पष्ट बनतो विचार
विचारा आदरी विचार

विचार विचारा आव्हान
सुविहीत सृजनशील साकार
प्रतिवादे सुधारे वाद

सुजनीं खेळता विचार
प्रतिवाद खंडितो विचार
झुळझुळता झरा संवाद

वाद... प्रतिवाद.. संवाद.

विचारे आकळे विचार
आचारें बिंबतो विचार
संवादे सुधारे विचार

विचारी आदळे विचार
नाद करित घडे वाद
संघर्ष पेरितो वाद

विचारा झोंबतो विचार
सुस्पष्ट बनतो विचार
विचारा आदरी विचार

विचार विचारा आव्हान
सुविहीत सृजनशील साकार
प्रतिवादे सुधारे वाद

सुजनीं खेळता विचार
प्रतिवाद खंडितो विचार
झुळझुळता झरा संवाद

घडावे विचार मंथन
टिकावा आदर सन्मान
न घडावा कधी अपमान

सदानंद.

सदानंद.

Monday, December 14, 2020

पाऊल वाट

पाऊलवाट...

पिकल्या पानांची पाऊलवाट
सोनसळी रंगाची अनोखी बरसात.

ऊन साउलीची मिळे नित्य साथ
रंग सरत्या वाटेलाही पावलांची आस .

प्रखर गहिरे कधी कुंद भासणारे
क्षण सोनेरी कधी अंधार ल्याले .

वाट एकाकी अशीही हरवून सापडणारी
शोध घेता कुणाचा अंतरंगी गवसणारी.

एकट्याला पुरेशी लहानशी वाट
सोबतीला हृदयातील फक्त एक वेणूनाद.

सदानंद.


Painting by Italian artist Giovanni Fattori (1825-1908

Sunday, December 13, 2020

लाटा

लाटा...
उसळती फेसाळती आदळती लाटा
निस्तब्ध खडकांना झिजवती लाटा. 
रोरावती झेपावती खळाळती लाटा
गाज अंतर्यामी घोंगावती लाटा.
गरजती बरसती आक्रमती लाटा
धरणीला आवेगाने भेट देती लाटा.

डॉ सदानंद चावरे
१४-१२-२०२०

Tuesday, December 8, 2020

वृक्ष एकाकी..


जळ अथांग पसरले,वेढून मजला घेतले,
जीवन सरितेचे जल,प्राशनासी लाभले.

जीवनाचे हिरवे कोंभ,माथ्यावरी सांभाळिले,
गळाभर पाण्यात नित्य,तप चिरंतन चालले.

उभा पाठीसी कधीचा,नग निश्चल उंचसा,
वागवितो अंगभर,चैतन्याच्या खाणाखुणा.

उंच स्वच्छंद निळाई ,आभाळ तेज खुलविते,
लेऊन आभाळ रंग,जल आकाश रंगी जाहले.

निस्तब्ध शांत एकांत हा,मम मनास तोषवी,
जीवन रंगी रंगताना,जणू अलिप्त होणे शिकवी.

© डॉ सदानंद चावरे
७-१२-२०२०

बिंब तेजाचे..

बिंब तेजाचे...

बिंब तेजाचे सोनेरी,आकाशी प्रकटले,
जणू उषेच्या अंगणी, चैतन्य पालावले.

ढग थोडेसे दाटुनी,प्रकाश किरणे विखुरली,
नदीच्या शांत प्रवाही,प्रकाश पहाट उतरली.

निजलेली झाडे तीरावर,जाग येऊ लागली,
डोकावुनी जळात बघता,प्रतिबिंबे सुखावली.

गूढ प्रसन्न काहीसे ,गगनात अवतरले,
सकाळचे भारलेले,क्षण सोनेरी जाहले.
© डॉ सदानंद चावरे
७-१२-२०२०

Friday, December 4, 2020

Study... अभ्यास

अभ्यास.....

ॐ अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् । अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय ॥९ ॥(१२ अध्याय)


यदि तू मनको मुझमें स्थिररुप से स्थापन करनेमें असमर्थ है, तो हे अर्जुन ! अभ्यासयोग द्वारा मुझे प्राप्त होनेकी इच्छा कर । ॐ ॐ ॐ


प्रस्तुत  श्र्लोक अर्जुन व श्रीकृष्ण यांच्यात घडलेल्या संवादातील एक महत्त्वाचा विचार मांडतो.यात एखादं लक्ष, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय काय गरजेचे आहे ?

मन मुळातच चंचल आहे. लक्षप्राप्तीसाठी त्याचे ' ध्यान' एक केंद्री होणे, लक्षा वर स्थिर होणे गरजेचे आहे. त्याशिवाय मानसिक क्षमता व ऊर्जा पूर्णांशाने एकवटणार नाहीत. पण हे कसे घडावे?
अभ्यासयोग हा एक वेगळा शब्द समजावून घेणे क्रमप्राप्त आहे.अभ्यासाला योगाचा दर्जा दिला आहे.

“बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते। तस्माद्योगाय युज्यस्व योग: कर्मसु कौशलम्”।।इति।।२/५० गीता

प्रत्येक काम कौशल्य पूर्ण करणे ही योगाची व्याख्या गीतेतील दुस-या अध्यायात आली आहे.

म्हणजेच अभ्यास ही गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे.जे ध्येय ठरवले असेल ते जर परिपूर्ण करायचे असेल तर त्यात पूर्णांशाने आपले चित्त असले पाहिजे.

मन एकाग्र करण्याचा अभ्यास असेही योगा बाबत म्हणता येईल.
तसेच मनाला स्थिर करण्यासाठी अभ्यासाची जरुरी आहे.

एकतर अभ्यास प्रामाणिकपणे करायला हवा.
स्वत:शी अत्यंत प्रामाणिक पणे करायला हवा.
लक्ष निश्चित करायला हवे.

अभ्यास ही प्रक्रिया आहे. उद्दिष्टाशी समरसता असेल ,दिशा सुस्पष्ट असेल तर हा प्रवास आनंददायी होईल.एखादी गोष्ट करताना आतून समाधान होत असेल तर कष्ट करायची तयारी टिकून रहाते व अडचणींचा सामना करीत पुढे जाणे,एक एक टप्पा गाठत जाणे सातत्याने होत रहाते.

या मार्गावर टिकून रहाताना आपल्या प्रयत्नां इतकेच मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.अध्यात्म क्षेत्रात सद्गुरुंचे महत्त्व आहे.भौतिक गोष्टींमधे , नित्य व्यवहारात देखील मार्गदर्शक महत्त्वाचा असतो.तो कधी शिक्षकांच्या रूपात असेल,कधी वरिष्ठ ज्ञानी व्यक्ती स्वरूपात असेल किंवा वडीलधारी व्यक्ती स्वरुपात असेल.तर कधी ग्रंथ रुपात ही असेल.

मुळात मार्गदर्शन मिळण्यासाठी आपण तो अधिकार मान्य केला पाहिजे.विनम्र वृत्तीने वागले पाहिजे.जो सल्ला मिळाला तो कृतज्ञ भावनेने स्वीकारून वर्तनात सुयोग्य बदल केला पाहिजे.अनुभवाच्या कसोटीवर तपासून बघितला पाहिजे.पण केवळ तर्कदुष्ट विचार करीत राहिले तर वरील साखळी--- विचार ग्रहण करण्याची --- स्विकारून अंमलात आणणे--- व नंतर अनुभवांती अनुमान बांधणे... ही घडणार नाही.

वाक्पटुत्व येईलही व केवळ बुद्धी बळावर आपण कदाचित मुद्दे खोडून काढण्यात तरबेज ही होऊ.
पण शिकणे... अभ्यास...व स्वत:त उत्तरोत्तर सुधारणा ही प्रक्रिया राहून जाईल.

डॉ सदानंद चावरे
५-१२-२०२०


Tuesday, December 1, 2020

mirror..आरसा..

आरसा...

आरसा असतोच एक आभास,
आपलंच प्रतिबिंब दाखवणारा.
आरसा असतो एक समतल पटल,
लांबी रुंदी खोली काहीच नसणारा.

आरसा असतो नितळ स्वच्छ पारदर्शी,
जे जसं असतं तसंच दर्शवणारा.
आरसा असतो खूपसा प्रामाणिक
हातचं काही न राखणारा ,काही न घालणारा.

चेह-यावरचा आनंद, ताण दाखवताना
स्वत: अलिप्त निर्लेप मोकळा रहाणारा.
खूप प्रतिमा येत जात असतानाही 
प्रत्येक प्रतिमेशी तितकाच एकरूप होणारा.

आरशाला नसतो भूतकाळ अन् भविष्यकाळही
आरसा असतो अखंड वर्तमानात जगणारा.
एक साधी काच तिला पारा लावलेला,अपारदर्शक बनलेला
इतरांना संपूर्ण पारदर्शकता शिकवणारा ...आरसा.

बहिरंगाचे यथार्थ दर्शन नित्य घडवणारा,
डोकावणा-या प्रत्येकाला सावध करणारा.
तरीही कुठं तरी काहीतरी निसटून जातंय,
शोधतोय मी ..अंतरंगही दाखवणारा एक ... आरसा.

डॉ सदानंद चावरे
३०-११-२०२०

mirror..आरसा..

आरसा...

आरसा असतोच एक आभास,
आपलंच प्रतिबिंब दाखवणारा.
आरसा असतो एक समतल पटल,
लांबी रुंदी खोली काहीच नसणारा.

आरसा असतो नितळ स्वच्छ पारदर्शी,
जे जसं असतं तसंच दर्शवणारा.
आरसा असतो खूपसा प्रामाणिक
हातचं काही न राखणारा ,काही न घालणारा.

चेह-यावरचा आनंद, ताण दाखवताना
स्वत: अलिप्त निर्लेप मोकळा रहाणारा.
खूप प्रतिमा येत जात असतानाही 
प्रत्येक प्रतिमेशी तितकाच एकरूप होणारा.

आरशाला नसतो भूतकाळ अन् भविष्यकाळही
आरसा असतो अखंड वर्तमानात जगणारा.
एक साधी काच तिला पारा लावलेला,अपारदर्शक बनलेला
इतरांना संपूर्ण पारदर्शकता शिकवणारा ...आरसा.

बहिरंगाचे यथार्थ दर्शन नित्य घडवणारा,
डोकावणा-या प्रत्येकाला सावध करणारा.
तरीही कुठं तरी काहीतरी निसटून जातंय,
शोधतोय मी ..अंतरंगही दाखवणारा एक ... आरसा.

डॉ सदानंद चावरे
३०-११-२०२०

Monday, November 30, 2020

रामायणातील नावे... थोडा शोध.

रामायणातील नावे खूप अर्थपूर्ण आहेत.
दशरथ - दहा घोड्यांचा रथ, ज्याचे शरीराच्या दहा इंद्रियजनित विकारांवर पूर्ण नियंत्रण आहे असा जित इंद्रिय पिता.

कौसल्या- कोसल देशीची राजकन्या.कसला तरी सल मनात सहन करणारी सोशिक स्त्री. तो सल सवतींच्या असण्याचा, त्यांच्या वर्तनाचा, दीर्घ कालपर्यंत पुत्रप्राप्ती न झाल्याचा असू शकेल. रामजन्म हा त्या सर्वांवरील रामबाण उपाय .

सुमित्रा:- जगाशी मैत्री पूर्ण नाते राखणारी राजस्त्री.कौसल्या व केकयी यांची व्यक्तीमत्वे प्रसंगोपात्त समजतात . पण सुमित्रा लक्षमणाची आई ही एक ओळख सोडली तर वेगळी ओळख बाळगताना दिसत नाही. इतकी ती मिसळून गेली आहे.  

कैकयी:- अनेक व्रते वैकल्ये चिकाटीने करणारी कणखर व बलशाली स्त्री. दशरथाला विजयश्री मिळवून देण्यासाठी अक्षरशः 'हातभार' लावणारी महान लढवैय्यी.

अशा थोर माता पित्यांच्या पोटी जन्मलेली मुले..

राम:- अखिल विश्र्वाचे विश्राम धाम ,निवासाचे हक्काचे आधाराचे ठिकाण म्हणजे राम.सुरवातही राम, अंतही राम असा अनादि अनंत राम.

लक्ष्मण:- ज्याच्या मनाचे लक्ष केवळ श्रीराम असा समर्पित जीवन जगणारा ,रामाची सावली बनून राहिला तो भ्राता.

भरत:- राम प्रेमाचे अखंड भरते आलेला, भक्तीरस सागर भरत.
शत्रुघ्न:- शत्रूंसाठी थरकाप उडवणारा त्यांना जिंकणारा परम प्रतापी भ्राता. माणसाच्या जीवनात बाह्य शत्रूंपेक्षाही बलशाली असतात ते भाव भावना व विकार रूपी शत्रू. त्यांच्यावर विजय मिळवायचा तर राम निकट संन्निध्य आवश्यक. भरत संन्यस्त वृत्तीने रहात असताना अयोध्या रक्षणाची जबाबदारी पार पाडणारा शत्रुघ्न.

मंत्री सुमंत:- ज्या राज्याचा मंत्री स्थिर मति, सु मति असणारा व स्वामी निष्ठ आहे ते राज्य अजिंक्य रहाणार हे सुनिश्चित व त्या राजाला सतत योग्य सल्ला मिळणेही स्वाभाविकच. आपल्या शरीरात सद् सद् विवेक बुद्धी ही मंत्रीवर सुमंताचे कार्य करीत रहावी.

सुग्रीव, मारुती,जांबुवंत ,जटायू हे निरनिराळ्या प्राणी जमातीतील लोक, राजकुलीन लोकां इतकेच गंगा किना-यावरील केवट, आदिवासी या सर्वांशी रामाचे सख्य व छोट्या खारी सकट सगळ्यांचा राम कार्यात सक्रिय सहभाग हे सगळं सूचक आहे. भगवंताचे सर्वांशी भूतमात्रांशी जोडलेले असणे खूप लोभस व आश्वासक आहे. आपणही या कार्यात सहभागी होऊ शकतो असा भक्तांना दिलासा देणारे आहे.प्रभू पदाशी कोणताच भेदभाव नाही हे सुचविणारे आहे.

श्रीराम- जानकी हे तर अद्वैतच. संपूर्ण जगाचं जनकत्व पालकत्व असलेलं अर्ध नारी नटेश्वराचं स्वरूप. सीता हे स्त्रीच्या सौशीकतेचं, सहनशीलतेचं,सुसंस्कृततेचं ,पतीवरील एकनिष्ठ अदम्य  विश्वासाचं परमोच्च दर्शन.

रावणाच्या पक्षातही बिभिषण,मंदोदरी हे सत्प्रवृत्त लोक .राक्षस कुळाचे असूनही श्रीरामांचे अवतार स्वरूप उमजलेले.
या उलट महान शिवभक्त असूनही मद मोह व अहंकार यांच्या पायी स्वहित पराङमुख रावण.याच्या जवळ काय नव्हतं? धैर्य शौर्य,अपार शक्ती. पण भगवंताचे वर मिळूनही पथभ्रष्ट झाला व स्वत:च्या व लंकेच्या विनाशाला कारण झाला.इंद्रजित रावणाचा मुलगा. तेजस्वी,शूर पण वारसा हक्काने आलेल्या दंभाने त्याचा बळी घेतला. त्यानेही उग्र तपश्चर्या केली होती व या अर्थाने तो रावणाचा वारस ठरतो.

रामायणातील पात्रे ही उत्तम गुण व दुर्गुण यांचे मिश्रण आहेत.कुठल्या गुणांचे प्राबल्य आहे त्यावर तुम्ही कुठल्या पक्षाचे ते ठरते. आपल्या जीवनात तरी काय वेगळे घडते?

सुग्रीव म्हणजे ज्याचा आपल्या जिभेवर ताबा आहे.बराचसा सात्त्विक प्रवृत्तीचा.पण रावणाला गवाक्षात उभा पाहून क्रोध अनावर झाल्याने उड्डाण करून सेनापतीला अशोभनीय धाडस करतो तेव्हा बुद्धी वर हृदयाचे प्राबल्य दिसून येते. या दु:साहसाबद्दल त्याला कान उघडणीही ऐकावी लागते.

तात्पर्य रामकथा बोधप्रद वाटते, कारण त्यातील कुठल्या ना कुठल्या प्रवृत्ती आपल्यातही दिसतात.आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर आपल्या वृत्तींवर प्रकाश टाकण्याची,त्या बाबत सुयोग्य मार्गदर्शन करण्याचं सामर्थ्य राम कथेत आहे हे नक्की.रामायण मानवी जीवनात आदर्श मूल्यांची प्राणप्रतिष्ठापना करताना दिसतं तर महाभारत हे व्यवहार व आदर्श यांच्यात समतोल साधायच्या प्रयत्नात दिसतं.त्यामुळे महाभारत हे आणखी विशाल पट व्यापताना दिसतं. तोपर्यंत होऊन गेलेल्या मनुष्य जीवनातल्या ब-या वाईट अनुभवांच्या समुद्राचं मंथन करून गीताख्य अमृत पुन्हा नवे आदर्श ठरवून देताना दिसतं. ही एक नव्याने वैचारिक मांडणी असावी.

डॉ सदानंद चावरे
१-१२-२०२०




Sunday, November 29, 2020

Faith... Trust..

विश्र्वास... Faith.. Trust..श्रद्धा.

जिवंत रहाण्यासाठी आवश्यक अशा श्वासा बदल जो विश्र्वास 
तितपत नि:शंक मनाने जेव्हा आपण एखाद्या बद्दल आश्वस्त असतो तो विश्र्वास.

विश्वस्त हा आणखी एक शब्द.यात संपूर्ण जबाबदारी तर आहे पण उपभोगाबद्दल अलिप्तता आहे. 'इदन्न मम ' असा भाव.विश्वस्ताबद्दल विश्र्वास असायला हवा व त्याने तो जपायलाही हवा.

मित्रांचा एकमेकांवर विश्वास, पतीचा पत्नीवर विश्र्वास ,गुरुचा आपल्या शिष्यांप्रती विश्वास तसेच भक्ताचा देवावर विश्वास अशी काही उदाहरणे देता येतील.या नात्यांना विश्वासाचा धागा धरून ठेवतो.नव्हे तो या नात्यांचा आधारच असतो.संदेह,किंतू हे या नात्यांना कमकुवत करतात.

प्रत्येक नातं हे काही अपेक्षांवर आधारीत असतं. जेवढी अपेक्षा पूर्ती तेवढी वीण घट्ट.तेवढा विश्र्वास पक्का. पण यात एक धोका आहे. अपेक्षा अपेक्षेइतक्या पूर्ण नाही झाल्या तर मात्र नात्यांचा डोलारा डगमगू शकेल.

ईश्र्वर आणी भक्त हे नातं थोडं निराळं.प्रभूची इच्छा म्हटलं की तो ठेवेल तसं. स्वत:ला चक्क वजा करायचं.चांगली परिस्थिती आली तर ती त्याची कृपा आणि वाईट परिस्थिती आली तरी त्याची इच्छा.असं समर्पण असेल तर मग अपेक्षांचे ओझे हे नाते वागवीत नाही.मोकळा संवाद.द्वंद्व संपलं की संघर्ष संपला.जगाशी आणि स्वत:शी देखील.

विश्वासात समर्पण व शरणत्वही आहे. विसर्जित करायला जे अवघड असते ते 'मी' पण इथे विराम पावते.द्वंद्व, दुविधा,संशय हे सगळे समूळ नष्ट होतील कारण मनातून 'मी' चा लोप झाल्यावर फक्त संपूर्ण शरणागत विश्वास सर्व भावनांची जागा घेऊन मनाचे अवकाश व्यापून टाकेल. 

Trust , Faith विश्वास , श्रद्धा हे खूप जवळ जवळ अर्थ छटा असणारे शब्द आहेत. तरीही थोडे थोडे वेगळे. श्रद्धा असेल तर विश्र्वास असेलच. श्रद्धेला तडा गेला तर विश्र्वास उरणार नाही. पण एखाद्या वर विश्र्वास असेल तर श्रद्धा असेलच असे नाही.श्रद्धा बसण्याआधी कितीतरी अनुभवातून विश्र्वास पक्का होत जावा लागतो. अतीव विश्र्वास श्रद्धेत परावर्तीत होत असावा. ज्या व्यक्तीवर श्रद्धा आहे तिचे वर्तन अपेक्षेपेक्षा खूप निराळे गैर घडले तर मात्र प्रथम श्रद्धा व नंतर विश्र्वास ढासळू शकेल.

जयजय रघुवीर समर्थ.
डॉ सदानंद चावरे
३०-११-२०२०

Monday, November 16, 2020

सांज समय

सांज समय...

सांज समयाला,आकाश कुंद झाले
दूर नभात कोठे,कंदील मंद झाले.

ही वाट रेखलेली,अधीर नागमोडी
गात चालली ही,धुंद मधुर गाणी.

उजळत्या दीपांचे,स्निग्ध स्नेह स्त्रवणे
जाहल्या ज्या भेटी,पुन्हा आठवून जाणे.

१५-११-२०२० बारामती - पुणे रस्ता सायंकाळी ६.३०-७ वाजता.
© डॉ सदानंद चावरे.


Thursday, October 22, 2020

रस रंगांची उधळण

अरुण उगवता क्षितिजावरती
रस रंगांची उधळण करितो
तमीं लोपल्या विश्वाला या
भूपाळीने जागे करतो

अंतरंगी जलाशयाच्या
क्षितिजावरूनी वाकुन बघतो
प्रतिबिंब तेजाचे पाडून
रजोगुणांची ऊर्जा देतो

नवतेजाचे स्वागत करण्या
कमलकलिका उमलुन येती
पुष्करणीचे दृष्य पाहुनी
मोदे रवि हा प्रदीप्त होतो

दूर वनराई आळसावलेली
प्रकाश वाटा उजळत जाती
काळोखाचे पारिपत्य होता
सळसळून सारी झाडे उठती

अज्ञानाची रात्र सरता
दिनकर हृदयी प्रज्वलित होतो
ज्ञान रुप पुष्करणीला
कमळ फुलांचा सुगंध येतो.

सदानंद
२३-१०-२०२०

Monday, October 12, 2020

दान अक्षरांचे

दान अक्षरांचे...

दान अक्षरांचे 
ओंजळीत घेऊन आलो
समजून अक्षरे फुलांना
अर्पीत मी निघालो

पूजा अक्षराची
शब्दांतुनी बांधतो
तरंग भावनांचे
हलकेच मी वेचितो

सुहृदांस वाटतो
आनंद काव्य पंक्ती
भावते जे मनाला
शब्दात मी मांडतो

क्षण दोन क्षणांचे
आनंद गान व्हावे
रिझवून रसिक मनाला
शांत करीत जावे

अर्घ्यही फुलांचे
शब्द गंगेत न्हावे
मिसळुनी जलाशी
विरघळून मी जावे

सदानंद चावरे
१३-१०-२०२०





Wednesday, October 7, 2020

ओहोटी

ओहोटी...

सूर्य बिंब क्षितीजावरचे
प्रकाश रेषा खुलून दिसे
जळात उतरले रंग उषेचे
तेज मिसळुनी चमचमते

पुळणी वरची ओली माती
स्मृती कशाची जपत असे
येऊन गेली लाट मघाशी
ओले पण ते मनी जपे

संधीकालचे अर्घ्य देत
रिक्त किनारा शांत दिसे
पोटामधली खळबळ विसरुन
गूढ  स्तब्धता उगी असे

चिंतन करितो कुणी अनामिक
मनी तयाच्या काय स्फुरे
ॐ काराची गाज ऐकतो 
निसर्ग सारा मज भासे

© डॉ सदानंद चावरे
७-१०-२०२०

Sunday, October 4, 2020

क्षितिजाच्या पलिकडे

क्षितिजाच्या पलिकडे...

सुदूर दिसते क्षितीज रेखा
नभात हरवून जाते
वाट दिसते कुठवर नेते
तिथवर कोणा जाता येते

ढगाळले नभ गगनी दिसते
अंधारुन का येते
प्रकाश शिंपुनी अलगद त्यावर
कोण उजळुनी जाते

डोंगर रांगा कितीक दिसती
नजर कुठवर जाते
क्षितीजाच्याही पल्याड काही
असेलसे वाटते

कोण नेईल हात धरूनी
अबोल साथ लाभते
वेणुनाद जो ऐकू येतो
तिथे जावे वाटते

मनपटलावर चित्र असे
कोण रेखीते
चित्रालाही जिवंत करणे
कुणामुळे साधते

हृदयस्पंदनी मंत्र नवेले
कोण गुंफीते
स्पंदन सरता हृदयाचेही
शांती केवळ उरते

डॉ सदानंद चावरे
५-१०-२०२०

Tuesday, September 22, 2020

पूर्व क्षितीज

रक्त लालीमा 
पूर्व दिशेला
कोण उधळितो
गुलाल ताजा

अलगद पुसतो
अंधार रात्रीचा
कोण उजळितो
कुंद नभाला

सहज जाता 
नजर बाहेरी
कोण तोषवितो
मना मनाला

© डॉ सदानंद चावरे
२३-९-२०२०

Monday, September 14, 2020

engineers Day

अभियांत्रिकीच्या तज्ञांस.....

यंत्र निर्मुनी कार्य साधता
कष्ट जगाचे सुकर करता
प्रगतीचे नव विश्व घडवता

अधुनिकतेचा वसा घेऊनी
नव्या जगासी तुम्ही निर्मिता
प्रगतीचे सोपान घडवता

कल्पना ज्या मानव करितो
प्रत्यक्षामधे तुम्ही आणता
वंदनीय ही कृतीशीलता

शास्त्र तंत्रज्ञानी मिसळुनी
उपयुक्ततेचा ध्यास घेता
अर्थ निर्मिता कार्य निर्मिता
रथ विश्वाचा गतीमान करता

Happy Engineer's Day
©Dr. Sadanand Chavare

Wednesday, September 9, 2020

मागणे

मागणे...

हाता मधे टाळ दे
मुखासाठी नाम दे
देवा तुझ्या भक्तीसाठी
थोडा तरी भाव दे

राम नामी ठाव दे
चित्ती समाधान दे
संघर्ष हे पेलण्याला
थोडे अवसान दे

वृत्तीचे रे भान दे
बुद्धीचेही दान दे
झिजण्यासी कुडीला तू
चंदनी वरदान दे

संकटांसी मात दे
थोडासा श्र्वास दे
त्रासलेल्या माझ्या लोकां
आरोग्याचा घास दे

© डॉ सदानंद चावरे
९-९-२०२०

Thursday, September 3, 2020

मैत्री

मैत्री

मैत्री म्हणावे कशाला
कशी भेट होई
कोणती वेळ कधी
जुळूनी येई

फळापरी मैत्री सुद्धा
परिपक्व होई
संवेदना सहवेदना
बनुनी जाई

कधी गप्पांचे फड
कधी गाण्याची लकेर
जीवन संगीत
फुलवून जाई

वाट चालता चालता
महावाट होई 
प्रवास सुखाचा
घडवून जाई

डॉ सदानंद चावरे
३-९-२०२०

Sunday, August 16, 2020

लाटेवर होऊनि स्वार

उसळती फेसाळती
खळाळती लाटा
स्वार होऊन त्यांवरी
धुंडाळते वाटा

फुंफाटले सुसाट
वेगे मी आरुढ
आव्हान पेलताना
मनी नाही हुरहुर

तळ लाटेचा क्षणात
क्षणी लाट ये पायात
आहे मलाच माझ्या
सागराचे आमंत्रण

© डॉ सदानंद चावरे
१६-८-२०२०

दूर क्षितीज रेषेला

दूर क्षितीज रेषेला...

दूर क्षितीज रेषेला
जरा थांबले आभाळ
निळ्या निळाईत
होते सारेच विलीन

निश्चळ जळ
स्तब्ध तसेच आकाश
दूर एकटेच दिसे
प्रकाशाचे एक बेट

नभ दाटले आकाशी
विखुरले पसरले
पंख कोणत्या परीचे
नभी विहरत आले

डॉ सदानंद चावरे
पारदर्शिका:- तुषार गणपुले
१६-८-२०२०

Tuesday, August 11, 2020

राधाकृष्ण



राधाकृष्ण...

राधा समजायला म्हटलं तर सोपी 
म्हटलं तर खूप कठीण.

ती त्याची गुरू होती
ती त्याची सखी होती

त्याच्यासाठी झुरणारी
त्याची प्रिया होती

यौवनाच्या पहाटे भेटलेली
अभिसारिकाही होतीं

त्याच्या हृदयाचं स्पंदन
जाणारी मैत्रीणही होती.

आयुष्यभर त्याची वाट पहाणारी
अलौकिक भक्तही होती.

विरहाची व्यथा जिरवणारी
महान योगिनी होती.

त्याची राणी नव्हती तरी
हृदय स्वामिनी होती

खरंच राधा कृष्णाची 
नक्की कोण होती?
© डॉ सदानंद चावरे
१२-८-२०२०

कृष्ण

कृष्ण...

प्रत्येकाला जसा भावला
तो कृष्ण निराळा होता

देवकीचा प्यारा बछडा
यशोदेचा नंद लाला

गोप गोपींचा साथी
राधेचा हृदय दुलारा

द्रौपदीचा  प्रियतम भ्राता 
रुक्मिणीचा प्रियकर झाला

मित्रांशी सख्यत्वे रमला
दुष्टांचा संहारक ठरला

विदुराचा होई पाहुणा
पांडवांचा संरक्षक मोठा

जाणुनी आतुनी सारेकाही
निर्विकल्प निर्लिप्त उरला

कृष्णाने सहज व्यापिला
पैस केवढा  मोठा होता

आदी अंत तयाचा
कधी कुणा आकळला

डॉ सदानंद चावरे
११-८-२०२०


Sunday, August 9, 2020

वाट वळणाची

वाट वळणाची...

वाट वळणाची
माझ्या छोट्याशा गावाची

डोंगरा पल्याड
साध्या भोळ्या संस्कृतीची

घाटदार वाट जाते
एका नव्याच जगात

मन शांत शांत होते
वाट अनोखी चालत

एखादे हटके झाड
भेटे आभाळा जाऊन

मावळती ऊन दिसे
मनी दाटे हुरहुर

सूर्य क्षितिजी थांबला
वाट दिसावी म्हणून

गाडीचे इंजिन
धावे उरी धपापून

डॉ सदानंद चावरे
१०-८-२०२०

Saturday, August 8, 2020

सांजवेळ

स्तब्ध जळ हे
स्तब्ध क्षण हा
आसमंत ही
विसावलेला

सांजवेळ की
उष:काल हा
संधिकाल हा
सजलेला

प्रशस्त डोंगर
सैलावले की
निसर्ग थोडा
सुखावलेला

जीवन नौका
जळी दिसतसे
तळात काही
गवसलेला

डॉ सदानंद चावरे
८-८-२०२०

Thursday, August 6, 2020

सूर्योदय

तेजाळले गगन सारे
सुवर्ण गोल उजळता
उजळली पाने फुले
नवरसाने झळाळता

फाकली अशी प्रभा
सुवर्ण कण उसळले
कोंडला तिमीर निमाला
पसरता नभी किरण फुले

सूर्य बिंबी दाटलेले
चैतन्य ये नभांतरी
प्रभात क्षण किरणोत्सवी
आभा फाके हृदयांतरी

डॉ सदानंद चावरे
७-८-२०२०
 

Wednesday, August 5, 2020

स्वप्नं

स्वप्नं...

स्वप्नांचं बरं असतं
मुक्त मोकळं होता येतं

स्वप्नांनाही रंग असतात
भावनांचे कढ असतात

स्वप्नांचं आपलं जग असतं
स्थल कालाचं बंधन नसतं

काही स्वप्नं विरुन जातात
काही खोल मूळ धरून रुजतात

काही स्वप्नं तात्कालिक
काही स्वप्नं सार्वकालिक

स्वप्नांनाही आशय असतो
अंतर्मनात उमटणारा नाद असतो

स्वप्न ओंजळीतल्या फुलासारखी
प्रवाहा बरोबर वाहात जाणारी

स्वप्न पिढ्यानुपिढ्या जपलेली
काळाचा प्रवाह थांबवणारी.. .बदलणारी.

डॉ सदानंद चावरे
६-८-२०२०

Monday, August 3, 2020

Nisarga Gan

निसर्ग संगीत..

गर्द निळ्या आभाळात
हिमवर्खी नभ दाटले
पर्वत शिखरांवरून थोडे
हिम घसरत आले

गर्द हिरवे काच पाणी
आरस्पानी नितळ झाले
डोकावून वृक्ष फुलांनी
रूप जणू न्याहाळिले

रक्तवर्णी लाल कुसुमे
जीवन तृष्णा होऊन सजले
हिरवाईने नटला परिसर
निसर्ग कंठी गान फुलले.

डॉ सदानंद चावरे
४-८-२०२०