अभ्यास.....
ॐ अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् । अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय ॥९ ॥(१२ अध्याय)
यदि तू मनको मुझमें स्थिररुप से स्थापन करनेमें असमर्थ है, तो हे अर्जुन ! अभ्यासयोग द्वारा मुझे प्राप्त होनेकी इच्छा कर । ॐ ॐ ॐ
प्रस्तुत श्र्लोक अर्जुन व श्रीकृष्ण यांच्यात घडलेल्या संवादातील एक महत्त्वाचा विचार मांडतो.यात एखादं लक्ष, उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय काय गरजेचे आहे ?
मन मुळातच चंचल आहे. लक्षप्राप्तीसाठी त्याचे ' ध्यान' एक केंद्री होणे, लक्षा वर स्थिर होणे गरजेचे आहे. त्याशिवाय मानसिक क्षमता व ऊर्जा पूर्णांशाने एकवटणार नाहीत. पण हे कसे घडावे?
अभ्यासयोग हा एक वेगळा शब्द समजावून घेणे क्रमप्राप्त आहे.अभ्यासाला योगाचा दर्जा दिला आहे.
“बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते। तस्माद्योगाय युज्यस्व योग: कर्मसु कौशलम्”।।इति।।२/५० गीता
प्रत्येक काम कौशल्य पूर्ण करणे ही योगाची व्याख्या गीतेतील दुस-या अध्यायात आली आहे.
म्हणजेच अभ्यास ही गांभीर्याने घ्यायची गोष्ट आहे.जे ध्येय ठरवले असेल ते जर परिपूर्ण करायचे असेल तर त्यात पूर्णांशाने आपले चित्त असले पाहिजे.
मन एकाग्र करण्याचा अभ्यास असेही योगा बाबत म्हणता येईल.
तसेच मनाला स्थिर करण्यासाठी अभ्यासाची जरुरी आहे.
एकतर अभ्यास प्रामाणिकपणे करायला हवा.
स्वत:शी अत्यंत प्रामाणिक पणे करायला हवा.
लक्ष निश्चित करायला हवे.
अभ्यास ही प्रक्रिया आहे. उद्दिष्टाशी समरसता असेल ,दिशा सुस्पष्ट असेल तर हा प्रवास आनंददायी होईल.एखादी गोष्ट करताना आतून समाधान होत असेल तर कष्ट करायची तयारी टिकून रहाते व अडचणींचा सामना करीत पुढे जाणे,एक एक टप्पा गाठत जाणे सातत्याने होत रहाते.
या मार्गावर टिकून रहाताना आपल्या प्रयत्नां इतकेच मार्गदर्शन महत्त्वाचे आहे.अध्यात्म क्षेत्रात सद्गुरुंचे महत्त्व आहे.भौतिक गोष्टींमधे , नित्य व्यवहारात देखील मार्गदर्शक महत्त्वाचा असतो.तो कधी शिक्षकांच्या रूपात असेल,कधी वरिष्ठ ज्ञानी व्यक्ती स्वरूपात असेल किंवा वडीलधारी व्यक्ती स्वरुपात असेल.तर कधी ग्रंथ रुपात ही असेल.
मुळात मार्गदर्शन मिळण्यासाठी आपण तो अधिकार मान्य केला पाहिजे.विनम्र वृत्तीने वागले पाहिजे.जो सल्ला मिळाला तो कृतज्ञ भावनेने स्वीकारून वर्तनात सुयोग्य बदल केला पाहिजे.अनुभवाच्या कसोटीवर तपासून बघितला पाहिजे.पण केवळ तर्कदुष्ट विचार करीत राहिले तर वरील साखळी--- विचार ग्रहण करण्याची --- स्विकारून अंमलात आणणे--- व नंतर अनुभवांती अनुमान बांधणे... ही घडणार नाही.
वाक्पटुत्व येईलही व केवळ बुद्धी बळावर आपण कदाचित मुद्दे खोडून काढण्यात तरबेज ही होऊ.
पण शिकणे... अभ्यास...व स्वत:त उत्तरोत्तर सुधारणा ही प्रक्रिया राहून जाईल.
डॉ सदानंद चावरे
५-१२-२०२०
No comments:
Post a Comment