Thursday, December 28, 2023

चिंतन

चिंतन २९ डिसेंबर.

२ .६ .१८ सत्कर्में ते नावडती | नाना दोष ते आवडती |पापभय नाहीं चित्ती | तो तमोगुण ||१८||

तमोगुण म्हणजे सत्वगुणाच्या १८० अंशात विरुद्ध स्वभावाचा माणूस.सत्कर्म म्हणजे ज्या योगे स्वतःचे ,समाजाचे भले होते असे कृत्य. शाश्वत स्वरुपाचे काम.ज्या योगे आपली सत्कीर्ती मृत्यू पश्चात टिकून राहते असे कृत्य.जे कार्य संत सज्जनांना मान्य आहे,नीती शास्त्र यांच्या चौकटीत बसणारे आहे असे कर्म .
ते आपोआप घडत नाही.करावे लागते.पण त्यासाठी सकारात्मक विचार व ऊर्जा हवी.पण आळस हा तमोगुणाचे प्रधान लक्षण आहे.विपरीत विचार हाही तमोगुणी माणसाचा स्थायीभाव आहे.त्याला सत्कर्मच काय सत्कर्मी लोकही आवडत नाहीत.हिरण्यकश्यपु,असुर ही उदाहरणे आहेतच.सध्या आपण काहीतरी कुरापती काढून युद्ध प्रवण नेते जगात पाहतो आहोतच.
कायिक वाचिक व मानसिक दोष आवडतात.ज्यांची घृणा वाटायला हवी ते आवडणे ही गंभीर समस्या आहे.चूक दुरुस्त करता येईल पण जर तसेच वागणे आवडत असेल तर मात्र कठीण आहे.हाताबाहेर गेलेली केस असे म्हणावे लागेल.पण समर्थांसारखे संत मात्र अशांना ही मार्गावर आणतात.वाल्या कोळ्याला दरोडा घालणे आवडत होते पण केवळ एक प्रश्न विचारून नारदांनी त्याचे डोळे उघडले.देहबुद्धी आत्मबुद्धी करायचा शाश्वत मार्ग सांगितला.म्हणजे त्यागार्थ सांगीतलेला हा तमोगुण कसा सोडवायचा याचा उपाय सद्गुरू जाणतात.

माणूस चुकीचे काम करण्यापासून परावृत्त होण्यासाठी पाप हातून घडेल ही भीती महत्वाची असते.आपल्या पापात वाटेकरी व्हायला कोणी तयार नाही.हे महापाप आपल्याच माथी येणार ही उघड उघड भीतीच तर होती.तिने काम केले‌.वाल्याचा वाल्मिकी झाला.पण हिरण्यकश्यपू कडे हे भयही वाटू नये इतका मोठा बलाचा अहंकार होता.देवाचा सज्जनांचा तिरस्कार होता.काय घडले? दारुण मरण आले.

समर्थ आपल्याला बोध करत आहेत की या पैकी काही आपल्या अंतरंगात शिरले असेल तर वेळीच सावध व्हा.दुर्गुणाचा वृक्ष होण्या पूर्वी च स्वपरीक्षा करा.शक्य नसेल तर संतांना शरण जा.ते तुमचा वृत्तीदोष खात्रीने घालवून देतील हा विश्वास बाळगा व लवकर कृतीशील व्हा.

जय जय रघुवीर समर्थ.

Wednesday, December 27, 2023

शाळा

शाळा मदीय स्मरते,नित्य हृदयांतरी|
खेळलो बागडलो इथे, मुक्त पाखरापरी ||१||

स्वजन मिळाले इथे, जिवलग मित्रांपरी |
स्वहित कळाले जिथे,सहज शिक्षणातुनी||२||

शिक्षक विद्वद्जन भेटले, अर्थ भरती अक्षरी|
ताडिले क्वचित कारणी,प्रेम अधिक देऊनी ||३||

सरता बाल्य शाळा सरली,उरली मनी साजिरी |
हृदयी नित्य भरते अजुनी,हळवी जाग राहिली ||४||

बोलाविते ती अजुनही, वर्षे बहु जाहली|
अंकी तिच्या वाटते,धाव घ्यावी खेळुनी||५||

डॉ सदानंद अरुण चावरे.
नूमवीय १९८४ दहावी अ.

शाळा

शाळा मदीय स्मरते,नित्य हृदयांतरी|
खेळलो बागडलो इथे, मुक्त पाखरापरी ||१||

स्वजन मिळाले इथे, जिवलग मित्रांपरी |
स्वहित कळाले जिथे,सहज शिक्षणातुनी||२||

शिक्षक विद्वद्जन भेटले, अर्थ भरती अक्षरी|
ताडिले क्वचित कारणी,प्रेम अधिक देऊनी ||३||

सरता बाल्य शाळा सरली,उरली मनी साजिरी |
हृदयी नित्य भरते अजुनी,हळवी जाग राहिली ||४||

बोलाविते ती अजुनही, वर्षे बहु जाहली|
अंकी तिच्या वाटते,धाव घ्यावी खेळुनी||५||

डॉ सदानंद अरुण चावरे.
नूमवीय १९८४ दहावी अ.

Datta Prabhu

दत्त प्रभू...

ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर
त्र्यैमूर्तीचे रूप मनोहर
अनुसूया सुत अत्रि नंदन 
उद्धराया जन आले भूवर |

सत्व रज तम त्रिगुणात्मक
त्रिभुवन चालक परम हितकारक
पालक तारक अन् संहारक 
सिद्ध मुनींचे तप संरक्षक |

तेजोमय हे प्रसन्न दर्शन 
कृपा वर्षितो हा करुणा घन
दिसे मुख हे सात्विक सुंदर
नेत्री भावहे मंगल पावन |

डॉ सदानंद चावरे पुणे.
२७-१२-२०२३

Thursday, November 23, 2023

इवलासा मी...

एवढ्या मोठ्या तळ्यात
इवलासा मी
डोकावून जरा पहातो
दिसतो कसा.

माझा डौल माझे रंग
सजलेला मी
प्रतिमा माझी पहातो
आहे कसा.

नितळ पाण्याच्या तळात
हलते काही
नजर स्थिरावून वेध
घेतो जरासा.

वर अथांग आकाश 
मी एकाकी
चोहीकडे भरले जळ
शोध अस्तित्वाचा.

सदानंद चावरे

Thursday, April 27, 2023

मनाचे श्लोक क्रमांक ३

प्रभाते मनी राम चिंतीत जावा। 
पुढ वैखरी राम आधी वदावा॥ 
सदाचार हा थोर सांडू नय तो। 
जनीं तोच तो मानवी धन्य होतो॥३॥ 

Morning , beginning of a day,is  auspicious pious time. Best to start a day remembering God. Before even voice generates, let mind recite His name. 

राम नाम हाच सदाचार.तो सोडायचा नाही. ते व्रत सांडायचं नाही.सत् आचार - चांगलं वर्तन.म्हणजे काय ते आधीच्या श्लोकात सांगितले आहे- जनी वंद्य ते सर्व भावे करावे. समाज रीतीला धरून व्यवहार असेल असा माणूस लोक मान्यता मिळवतो लोक त्याला नावाजतात.

प्रभात म्हणजे दिवसाची सुरुवात.रात्रीचा अंधार सरून प्रकाश भरून रहाण्याची वेळ.रात्र ही अज्ञानाचे प्रतीक आहे.ज्ञान प्रकाशाचे.उष:काल संधीकालही असतो.तशीच संध्याकाळही.म्हणून संध्या अग्निहोत्र अशा साधना दोन संधीकाली केल्या जातात.
वैखरीने इतर प्रापंचिक गोष्टी उच्चारण्यापूर्वी रामनामाने सुरुवात करायची.अन्यथा इतक्या गोष्टी बोलायला सापडतील की त्यात साधे सोपे फुकट असलेले नाम घ्यायची आठवण आपल्याला रहाणार नाही.आपल्या मनाच्या या खोड्या समर्थ ओळखून आहेत.म्हणून मनाला अशी सवय लागली की कोणताही शब्द उच्चारण्यापूर्वी रामनाम मनात ,हृदयात घुमावे.आपोआप घुमावे.ही सवय लागली की अजपा जप आपोआप होऊ लागतो हे मनाचे सामर्थ्य आहे त्याचा सदुपयोग करून घ्यायची आहे.म्हणून तर समर्थ मनाला मना ' सज्जना' असे म्हणून त्याचे कौतुक करतात.
कोणता सदाचार सोडायचा नाही? तर प्रभाती सुरुवात राम नाम जपाने करायची.असे जो करील तो मानवी धन्य होतो म्हणजे लोकांमधे वंदनीय ठरतो, अनुकरणीय ठरतो हा एक भाग आणि ज्यांच्या मनाचे लगाम बुद्धी चे नियंत्रण प्रभू राम करतात त्यांचे जीवन प्रभू कारणी लागते.त्याच्या इच्छेने सारे घडू लागले की जे त्या जीवासाठी, समाजासाठी,विश्वासाठी हितकारक असेल तेच घडेल.
मानवी धन्य होणे याचा आणखी एक अर्थ म्हणजे ज्या हेतूंसाठी मानवी जन्म मिळाला,ते साध्य होणे.मानवी जन्माचे साध्य म्हणजे स्वस्वरूपाची ओळख होणे, अद्वैत साधणे,ईश्वराची एकरूप होणे. 
हे सगळे साध्य होण्याचे सोपे साधन , परिणामकारक साधन म्हणजे नामसाधना.म्हणून प्रभाती रामनामाचा जप करण्याचा सदाचार अंगी बाणव असा समर्थांचा मनाला म्हणजे आपण सर्वांना आग्रह आहे.
मनोबोधातला हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा असून उपासनेची दिशा निश्चित सांगणारा आहे.समर्थांच्या साधनेचा,स्वरूप साक्षात्काराचे सामर्थ्य या श्लोकामागे उभे आहे.

डॉ सदानंद चावरे पुणे.

जय जय रघुवीर समर्थ.

Friday, March 10, 2023

मागे वळून पहाताना...

वळुन पाहतो मी
आसमंत सारा
लाभला जेथ मजला
क्षणाचा निवारा

कृतार्थ भाव ऐसा
मनी उगवला
जीवनाचा अवघा
उत्सव की मांडला.

रंग त्यात भरता
ईश स्वहस्ते
खूश त्या करावे
उधळून रंग सारा.
फोटो:- जयदीप लिमये 
सदानंद
११-३-२०२३

झेप

घ्यायची इथून झेप
ना इथे परतायचे
निरखून नीट पाहून
पंख मला पसरायचे.

दिला आधार मजला
क्षण एक विसावा
कृतार्थ मी हे जणु
वाकुनी सांगायचे.

जीव इवलासा
रंग रंगली मेहेफिल
टिपुनी सूर स्वर सारे
गगनी मुक्त विहरायचे.

फोटो :- जयदीप लिमये 
सदानंद.
१०-३-२०२३